स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्याची कामगिरी कौतुकास्पद

प्रकल्पांची उपयोगिता व गुणवत्ता तपासावी महामहीम राज्यपालांचे निर्देश

0

सुनील इंदुवामन ठाकरे, मुंबई: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्राने चांगली कामगिरी बजावली. शहरी व ग्रामीण भागात स्वच्छतेसंदर्भात जी कामे केली जात आहेत त्याच्या प्रगतीसंदर्भात वेळोवेळी अचानक भेटी द्याव्यात. त्या कामांची गुणवत्ता व उपयोगिता तपासावी, असे निर्देश महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रशासनाला दिले.

राजभवन येथे आयोजित ग्रामीण व शहरी हागणदारीमुक्त अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव एम.डी. पाठक, स्वच्छ भारत मिशनच्या (शहरी) कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे आदी अधिकारी उपस्थित होते.

महामहीम राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले की, देशात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोठी चळवळ सुरू आहे. त्यामुळे स्वच्छतेविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली. राज्य शासनाने हागणदारीमुक्तीच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागात चांगली कामगिरी केली आहे. ओला व सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन व पुनरप्रक्रिया या बाबतीतही राज्याने भरीव कामगिरी केली.

सार्वजनिक व घरघुती शौचालयांचा प्रत्यक्षात वापर होतो का, त्याची देखभालदुरूस्ती, पुनरप्रक्रिया केलेला बायोगॅस, कम्पोस्ट खताचा वापर कसा व किती प्रभावीपणे केला जातो आदी बाबींची विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन शहानिशा करावी. असे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले. आपण स्वत: अशा भेटी देणार असल्याचेही महामहीम राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

दरम्यान अपर मुख्य सचिव चहांदे यांनी ग्रामीणची तर प्रधान सचिव पाठक यांनी शहरी भागाची पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राज्यपालांना स्वच्छता, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, पुनरप्रक्रियायाबाबत राज्याने केलेल्या प्रगतीची माहिती करून दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.