आज कोरोनाचे 42 रुग्ण, दोघांचा मृत्यू

गणेशपूरमध्ये कोरोनाचा तांडव, 10 पॉजिटिव्ह

0

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजीही कोरोनाचा रौद्रावतार सुरूच राहिला. काल तालुक्यात 41 रुग्ण आढळल्यानंतर आज 42 पॉजिटिव्ह रुग्ण आलेत. एका दिवशी आलेली आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. याशिवाय आज दोघांचा मृत्यू देखील झाला. आज आलेल्या रुग्णांपैकी 37 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार तर 5 रुग्ण हे ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 460 झाली आहे. आज जनता कर्फ्यू लावावा की नाही याबाबत निर्णय़ होणार होता. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. एकता नगर येथील काही भाग सिल करण्यात आला आहे. मात्र तिथे सुरक्षा रक्षक नसल्याने रहिवाशांचा बाहेर मुक्तसंचार सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान पोलीस विभागाने विना मास्क व्यक्तींना दणका देऊन प्रत्येकी 500 रुपयांचा दंड वसूल केल्याचा परिणाम आज दिसून आला. आज वणीकरांनी विनाकारण खिशाला चोट नको म्हणून मास्क व रुमाल वापरणे पसंत केले.

आज यवतमाळहून 61 अहवाल प्राप्त झाले. यात 37 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 24 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. याशिवाय आज 14 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 9 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 23 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. तर अद्याप 120 अहवाल येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात 460 पॉजिटिव्ह व्यक्ती झाल्यात. यातील 291 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 159 ऍक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्ण आहेत. तर तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झाल्याची संख्या 10 झाली आहे.

गणेशपूरमध्ये कोरोनाचा कहर
आज आलेल्या रुग्णांमध्ये गणेशपूर येथे 10, भांदेवाडा येथे 5, चिखलगाव 3, भालर 2 तर शहरातील शास्त्रीनगर येथे 5, सेवानगर 5, झेडपी कॉलनी 4, भीमनगर 2, तर रविनगर, विद्यानगरी, बेलदारपुरा, लक्ष्मीनगर, गायकवाड फैल येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. याशिवाय आज चिखलगाव व वणी येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

आज 6 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 6 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 159 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 70 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 89 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 16 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 85 व्यक्ती भरती आहेत.

जनता कर्फ्यूवर अद्याप निर्णय नाही
काल जनता कर्फ्यूबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कालची बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सोमवारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यावर वृत्त लिहत पर्यंत कोणताही निर्णय़ झाल नव्हता. काल झालेल्या बैठकीत अधिकाधिक व्यक्तींनी जनता कर्फ्यू नकोच असा सुर लावला होता. आता जनता कर्फ्य़ूबाबत काय निर्णय़ होते याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.

एकता नगरमधील नागरिकांचा बाहेर मुक्त संचार
एकता नगरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर तिथला काही भाग सिल करण्यात आला. मात्र तिथून अनेक लोक बाहेर जात असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. सीमा सील केल्याच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने तिथून कन्टेन्मेंट झोन मधले काही लोक बाहेर जाऊन फिरत असल्याची माहिती आहे. अशा महाभागांवर कार्यवाही करावी अशी मागणी इथल्या सुजाण नागरिकांकडून करण्यात येत आहे.

(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.