उद्या चिलई – गणेशपूर रस्त्यावर ओव्हरलोड वाहतुकीविरोधात चक्का जाम आंदोलन

कंपनीची ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याची गावक-यांची मागणी

तालुका प्रतिनिधी, वणी: चिलई, गणेशपूर भागात मोठ्या प्रमाणात कंपनी आहेत. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कंपनीच्या ट्रकची ओव्हरलोड वाहतूक सातत्याने सुरू असते. त्यामुळे चिलई ते गणेशपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आधीही तक्रार करण्यात आली. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर गावक-यांनी चक्का जाम आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दिनांक 20 सप्टेंबर रोजी या मार्गावर गावक-यांतर्फे चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.

एक वर्षांआधी चिलई ते गणेशपूर हा रस्ता चांगल्या स्थितीत होता. या रस्त्याची वाहतुकीची क्षमता ही 15 टन आहे. मात्र गेल्या एक वर्षांपासून या मार्गावर 30 ते 40 टनची वाहतूक होत आहे. त्यामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.

या गावातील गावक-यांना कायमच मुकुटबन येथे शिक्षण, बँक, बाजार इत्यादी कामांसाठी जावे लागते. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्कूलबस बंद होण्याची दाट शक्यता आहे. काही पालक दुचाकीने मुकुटबन येथे जातात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुचाकीचे सातत्याने छोटे मोठे अपघात होत असतात.

या मार्गावरून अवैधरित्या होणारी ओव्हरलोड वाहतूक तात्काळ बंद करावी अशी मागणी करीत गावक-यांद्वारा मंगळवारी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आणखी मोठे आंदोलन केले जाईल असा इशाराही गणेशपूर व चिलई येथील रहिवाशांनी दिला आहे.

हे देखील वाचा: 

आता दिवसाधवळ्या वणी शहरात घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

सर्वात कमी किमतीत खरेदी करा सोलर झटका मशिन

Comments are closed.