पेशवाई एकदा पुन्हा आपल्या उंबरठ्यावर उभी आहे

संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक प्रा.डॉ.सुदर्शन तारख यांचे प्रतिपादन

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात सुरू असलेली राजकीय घडामोडी बघता राजकारणाचा केंद्रबिंदू नीती कडून अनीति कडे जात असल्याचे दिसून येत आहे. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर संकट आणि धोका आपल्या पुढे आहे. हा धोका टाळण्याकरिता शिवचरित्र हे मार्गदर्शक ठरू शकते. अन्यथा पेशवाई एकदा पुन्हा आपल्या उंबरठ्यावर ऊभी आहे. असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक प्रा.डॉ.सुदर्शन तारख, जालना यांनी केले. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि छत्रपती महोत्सव समिती वणीच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव सोहळ्यात 19 फेबुवारी रोजी मार्गदर्शन करतांना वरील मत त्यांनी व्यक्त केले. डॉ.तारख यांनी शिवचरित्रातील अनेक प्रसंगांचा उल्लेख करून शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्ष, नितीमान, स्त्री-हितकारी भुमिका श्रोत्यांसमोर मांडली.

समाजामध्ये महिलांवर आणि शोषीत वर्गावर अन्याय होत असतांना आपली व्यवस्था मुकपणे बघत असते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मोठया कष्टाने भारतीय जनतेकरिता निर्माण केलेली राज्यघटना पावलोपावली सद्याच्या राजकीय व्यवस्थेकडून तुडविली जात आहे. लोकशाहीच्या आडून पेशवाई हळूवारपणे येत आहे. त्यामुळे समाजाचे मुलभूत प्रश्न मागे पडताना दिसत आहे . आणि याच कारणाने संभाजी ब्रिगेडने राष्ट्रीय स्तरावर ओबीसी जातनिहाय जनगणना आणि जुनी पेन्शन योजना लागु करण्याची मागणी केली आहे. शिवचरित्र हे कोणत्याही काळात मार्गदर्शक ठरू शकते म्हणूनच शिवचरित्राचे पारायण शाळा शाळांत आणि घरांघरांत सुरू झाले पाहीजे. अशी अपेक्षा आणि आवाहन त्यांनी केले

शिवाजी चौक येथे आयोजित या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना अंबादास वागदरकर यांनी मराठा सेवा संघ वणीच्या कार्याचा आढावा सांगितला. लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या अध्यक्षा संगीता संजय खाडे यांनी स्वागताध्यक्षाच्या भुमिकेतून उपस्थितांचे स्वागत करून मराठा सेवा संघाच्या कार्याला सदिच्छा दिल्या. शिवजयंती सोहळ्या निमीत्य महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जिजाऊ चौकातून शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर शिवतिर्थावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी वसंत जिनिंग चे अध्यक्ष आशिष खुळसंगे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, प्रख्यात विधीज्ञ निलेश चौधरी, चिखलगाव सरपंच रुपाली कातकडे, गणेशपुर सरपंच आशाताई जुनगरी, म.रा.जुनी पेन्शन संघटनेचे राज्य सरचिटणीस शैलेष राऊत, जि.प.कर्मचारी सह. पतसंस्थेचे संचालक विलास टोंगे, एलआयसीचे विकास अधिकारी हेमंत टिपले, केशव नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष दौलतराव वाघमारे ईत्यादी मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्तविक भुमिका मंगेश खामनकर यांनी विशद करून जुनी पेंशन आणि जातनिहाय जनगणेची आजची गरज स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनाली जेनेकार, संजय गोडे आणि शुभम कडु यांनी केले. उपस्थितांचे आभार दत्ता डोहे यांनी मानले. पाहुण्यांचे स्वागत शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी तसेच राजेश बोकडे, प्रा.नितीन मोहितकार, अशोकराव चौधरी, राजेंद्र देवडे, अरुण डवरे, विजय खाडे, पवन ढवस, मारोती महारतळे, रवि चांदणे, वसुधा ढाकणे, आशालता कोवे, योगिता विरुटकर, जगदिश ढोके, अमोल मडावी, जय वांढरे यांनी केले. शिवजयंती महोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नितीन मोवाडे, मारोती जिवतोडे, सुरेंद्र घागे, एड. अमोल टोंगे, विनोद बोबडे,वसंत थेटे, दत्ता डोहे, लक्ष्मण काकडे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.