चोरट्यांचा आता शेतमालावर डल्ला… 8 क्विंटल कापूस चोरी

घरफोडीनंतर चोरट्यांनी आता शेताकडे वळवला मोर्चा...

जितेंद्र कोठारी, वणी: चोरट्यांची आता शेतमालावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील मुर्धोनी गावात ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मुर्धोनी गावालगत अग्रवाल यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील बंड्यात वेचलेला कापूस ठेवलेला होता. रविवारी शेतीचे काम आटपून रात्री शेतातील सालगडी झोपायला घरी गेला. त्यानंतर रात्री चोरट्यांनी बंड्यात शिरून कापूस चोरून नेला. सोमवारी दिनांक 5 डिसेंबरला सकाळी 6.30 वाजता सालगडी शेतात गेला असता त्याला शेतातील बंड्यातील 7 क्विंटल (किंमत 56 हजार रुपये) चोरीला गेल्याचे आढळले. सालगडीने याची माहिती शेतमालकास दिली. त्यावरून शेतमालकाचे भाऊ विजय सीताराम अग्रवाल (39) यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम 461, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Comments are closed.