कडाक्याच्या थंडीत शेकोट्यांवर रंगतायेत निवडणुकीच्या गरमागरम चर्चा

...तर निवडणुकीचा खर्च कुणी करायचा ? गावपुढारी संभ्रमात

0

तालुका प्रतिनिधी, वणी: नुकताच राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील सेतू केंद्रावर गर्दी होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने नवीन जीआर काढला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्यपदासाठी सातवी पासची अट आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्याच्या अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. जो उमेदवार 1995 नंतर जन्मलेला असेल आणि ज्याला सदस्य किंवा सरपंच नियुक्त करायचं असेल तर संबंधित उमेदवार सातवी पास असणे आवश्यक आहे. 24 डिसेंबरला जीआर जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

परिणामी खेड्यापाड्यात कुडकूडणाऱ्या थंडीत पेटणाऱ्या शेकोट्यांवर निवडणुकीच्या चर्चा गरम होऊ लागल्या. सरपंचपदावर विराजमान होण्याची इच्छा मनात असणाऱ्या इच्छुकांनी गावात मोर्चेबांधणीस सुरुवात केली होती. मात्र सरपंच पदाचे आरक्षण हे ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यावर जाहीर होणार आहे. परिणामी सरपंचपदास इच्छुकांच्या आनंदावर पाणी फेरलं आहे. आता गावातील पॅनलचा खर्च कुणी करायचा ?असा प्रश्न गावपुढाऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

खेड्यापाड्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच या महत्त्वाच्या पदावर डोळा ठेऊन सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीला रिंगणात उतरवलं जातात. पॅनेल प्रमुखांसह भावी इच्छुक सरपंच पदाचा उमेदवार मिळून आपापल्या पॅनलचा निवडणूक खर्च उचलत असतं. मात्र यंदा सरपंच कोण होणार हे गुलदस्त्यात आहे. सरपंचपदाची आरक्षण सोडत ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर आहे. त्यामुळे पॅनल प्रमुख आणि सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. कारण खर्च एकाने करायचा अन् आरक्षण दुसरंच निघालं तर, अशी भीती पुढाऱ्यांत निर्माण झाली आहे.

यापूर्वी प्रत्येक निवडणुकीसाठी पॅनल प्रमुखांकडून सगळी यंत्रणा राबविली जात असे. उमेदवारांच्या उमेदवारीसाठी थकीत घरटॅक्स भरण्यापासून तर विजयाच्या गुलालापर्यंतचा सर्व प्रकारचा खर्च पॅनल प्रमुख उचलत असतो. मात्र यंदा सरपंचपद  कोणाकडे जाणार हे निवडनुकीनंतर समजणार आहे. त्यामुळे खर्च कुणी आणि कोणासाठी करायचा, हा कळीचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे निवडणुकीचा माहोल काहीसा थंडावल्याचे चित्र दिसत आहे. गावनिवडणुकीचा तगडा अनुभव असणारी राजकारणी या अडचणीतून काय मार्ग याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहेत. मात्र यंदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या बदलत्या कार्यक्रमाने गावागावातील चित्र पालटले आहे. 

हे देखील वाचा:

कमी दरात सोने विकण्याचे आमिष दाखवून सिनेस्टाईल लूट

हे देखील वाचा:

वाघाने केली गायीची शिकार, पाथरी येथील घटना

Leave A Reply

Your email address will not be published.