‘परिसरात कुणालाही कोरोना लसीचे साईड इफेक्ट नाही’

अफवांना बळी न पडण्याचे तालुका वैद्यकीय अधिका-यांचे आवाहन

0

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूजन्य महामारीवर उपचार म्हणून शनिवार 18 जानेवारी पासून देशभरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. वणी तालुक्यात शनिवार 18 जानेवारी पासून आयोजित कोविड 19 लसीकरण शिबिरात तब्बल 300 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ऑक्सफोर्डची कोविशील्ड लस देण्यात आली आहे. दरम्यान परिसरात लशीचे काही साईड इफेक्ट झाल्याची अफवा परिसरात पसरली. मात्र लस घेतलेल्या काही व्यक्तीना ताप व थकवा सारखं सौम्य लक्षणे वगळता इतर कोणताही त्रास जाणवत नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास कांबळे यांनी दिली. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सध्या लसीकरणचे दुष्परिणाम व साईड इफेक्ट् बाबत अनेक अफवांनाही पेव फुटले आहे. सोशल मीडियावर कोरोना लसीकरण या विषयावर तर्क वितर्क रंगू लागले आहे. तर दूरचित्र वाहिन्यांवर आयोजित चर्चासत्रमध्ये आरोग्य तज्ञ वेगवेगळे मत मांडताना दिसत आहे. सध्या भारतात ऑक्सफर्ड संशोधित व सिरम इन्स्टिट्यूट द्वारा तयार करण्यात आलेली कोविशिल्ड तसेच इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) संशोधित भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिन या दोन लस देण्यात येत आहे. काही ठिकाणी डॉक्टरांनी व कोव्हॅक्सिन लस घेण्यात नकार दिला होता. त्यामुळे याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत होते. वणीमध्ये ऑक्सफोर्डची कोविशिल्ड ही लस देण्यात आली आहे. 

लसीकरणाच्या पहिल्या टप्यात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. त्यानंतर महसूल व पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येईल. उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांना वैधकीय सल्लानंतरच लस देण्यात येईल. त्यानंतरच्या टप्यात सर्वसामान्यांना लस देण्यात येणार आहे. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात आलेली “कोविशील्ड” लस सर्वात प्रभावी व सुरक्षित असल्याचे सांगण्यात येते.

कुणालाही साईड इफेक्ट नाही – तालुका वैद्यकीय अधिकारी
वणी ग्रामीण रुग्णालयात सिरम कंपनीच्या “कोविशील्ड” या कोविड-19 व्हॅक्सिनचे 800 डोज प्राप्त झाले आहे. आता पर्यंत झालेल्या लसीकरणात या व्हॅक्सिनचे कोणतेही दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट झाल्याची तक्रार मिळाली नाही. लस घेतल्यानंतर आपल्या शरीरात इम्युनिटी वाढते, त्यामुळे काही प्रमाणात ताप व थकवा जाणवतो. मात्र भरपूर जेवण व पाणी पिल्याने एक दोन दिवसात अशक्तपणा कमी होतो. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये.
– डॉ. विकास कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी

हे देखील वाचा:

एसटीत शाळकरी मुलीचा विनयभंग, मोबाईलने फोडले आरोपीचे बिंग

विशेष पोलीस महानिरीक्षकांचा वणीत निरीक्षण दौरा

Leave A Reply

Your email address will not be published.