उत्तरदायित्व हा छत्रपतींचा स्थायीभाव-प्रा.डॉ. दिलीप चौघरी

शिवतीर्थावरील शिवजयंती व्याख्यानात प्रतिपादन

बहुगुणी डेस्क, वणी: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिताना केवळ भौगोलिक प्रदेश पादाक्रांत केला नाही, तर जिंकलेल्या प्रदेशात उत्तम प्रशासन व्यवस्था बसविली. उत्तरदायीत्व हा महाराजांचा स्थायी भाव होता.त्यांचे प्रजेवर पोटच्या पोरांसारखे प्रेम होते. महाराजांची ही कमजोरी हेरून शत्रू स्वराज्याच्या रयतेला त्रास देत असत. असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य आणि चंद्रपूर जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिलीप चौघरी यांनी केले.मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवतीर्थ येथे आयोजित शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमीत्य जाहीर सभेत डॉ. चौधरी यांनी प्रतिपादन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा आणि व्यक्तीमत्व एवढे आश्वासक आणि मोहक होते की, राजांची जनताच नव्हे तर त्यांचे शत्रुंही त्यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित होत. त्यामुळे आग्रा दरबारात शिवाजी महाराजांच्या समोर येण्याचे औरंगजेबाने टाळले होते.शिवरायांनी स्वराज्याचा अर्धाअधिक मुलूख केवळ रयतेचा त्रास वाचविण्यासाठी सोडला.आजच्या सत्ताधाऱ्यांनी शिवचरित्रातून किमान एवढे तरी शिकावे. शेतकऱ्याला चार पैसे देण्याची संधी मिळाली तर सरकार निर्यातबंदी करते. शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली आवळा देऊन कोहळा घेण्याचे धोरण आखत असते.

आजच्या सत्ताधाऱ्यांची राजवट पाहीली आणि आजची लोकशाही आणि शिवरायांची राजेशाही याची तुलना केली तर कोणालाही शिवरायांची राजेशाही बरी वाटेल. मानवी मूल्ये आणि नैसर्गिक संसाधनांची लूट पाहीली तर जगाचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे चारीत्र्यवान तरुणांनी राजकारणात येउन समाजाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी आणि शिवरायांना अपेक्षित मूल्ये प्रस्थापित करावी.असे आग्रही आवाहन त्यांनी केले.

बहुजन समाज ज्या पौष महिन्यात अगदी किरकोळ कार्य करण्याचा विचार करत नाही. त्या महिन्यात देशातील महत्त्वाचा असा राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणे म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरोहितांनी निर्माण केलेल्या पारंपारीक धार्मिक संकल्पना झुगारल्या असा होतो. सोबतच समाजाने पौष महिन्यात आता शुभ कार्य सुरू करावे. अतार्किक अशा धार्मिक कल्पना सोडून द्याव्यात,असे आवाहन त्यांनी केले.
 
या जाहीर सभेचे अध्यक्षीय मार्गदर्शन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर यांनी केले.स्वागतपर मनोगत स्वागताध्यक्ष तथा कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी व्यक्त केले.तर प्रास्ताविक भूमिका संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी मांडली.जाहीर सभेच्या पूर्वी मान्यवरांकडून शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.जाहीर सभेच्या प्रारंभी जिजाऊ, शिवरायांना अभिवादन झाले.नामदेव ससाणे, अमोल बावने, सोनाली थेटे, किरण गोडे यांनी सामूहिक जिजाऊ वंदना सादर केली. सोबतच कॉम्रेड शंकरराव दानव आणि शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जीवन पा. कापसे यांना मौन आदरांजली देण्यात आली.

याप्रसंगी मराठा सेवा संघाचे वतीने शेतमालाला रास्तभाव, जातनिहाय जनगणना, सरकारी नोकरभरती आणि जुनी पेंशन योजना या संदर्भाने शासनाला पाठवायच्या निवेदनाचे ठराव मंजूर करण्यात आले.संजय गोडे यांनी या ठरावाचे वाचन केले तर उपस्थितांनी हात उंचावून या ठरावाला संमती दिली.

सुरवातीस श्रीजा धांडे या चिमुकलीने सादर केलेली शिवगर्जना आणि सुरभी कुचनकर, धृव निखाडे, स्वामिनी कुचनकर, सुषमा डाहुले यांनी शिवचरित्रावर सादर केलेले संक्षिप्त सादरीकरण लक्षणीय ठरले. या वेळी दशरात्रौत्सवात झालेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण क्रां.सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे दत्ता डोहे आणि आशीष रिंगोले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मराठा सेवा संघाचे नितीन मोवाडे यांनी मानले. यशस्वितेकरिता भाऊसाहेब आसुटकार, सुरेंद्र घागे, विधीज्ञ अमोल टोंगे, वसंत थेटे, मारोती जिवतोडे आदींनी प्रामुख्याने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला वणीकर जनतेची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Comments are closed.