पाणी प्रश्वावर पेटूर येथील महिला आक्रमक
वणी: वणी तालुक्यातील पेटुर येथे गेल्या काही वर्षांपासून पाण्याचा प्रश्न आहे. मात्र हा प्रश्न सोडवण्या ऐवजी यावर केवळ आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या महिला मंगळवारी वणी पंचायत समितीवर धडकल्या. यावेळी महिलांनी तब्बल एक तास गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला.
गेल्या काही वर्षांपासून पेटुर या गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. दररोज सर्व गावकऱ्यांना आपली कामे सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातील मानकी येथील शाळेजवळ बोअरवेल आहे. त्या बोअरवेलला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. तिथून पाईपलाईन टाकून पेटुरला पाणी आणावे, अशी मागणी महिलांनी याआधी केली होती. पण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांचा धीर खचला व त्यांनी वणी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा नेला.
यावेळी त्यांनी याप्रश्नी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जर येत्या चार दिवसात पाण्याची समस्या न सोडवल्यास सर्व गांवकरी आमरण उपोषणास बसेल असा इशाराही त्यांनी दिला.

