बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतक-याचा सर्पदंशाने मृत्यू

मार्की (खु) येथील घटना, उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की (खु.) येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. दत्ता विश्वनाथ थेरे (50) असे मृत शेतक-याचे नाव आहे. दहा दिवसांआधी त्यांना शेतात काम करीत असताना सर्पदंश झाला होता. त्यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र सोमवारी 26 जुलै रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दत्ता विश्वनाथ थेरे (50) हे मार्की (खु.) येथील रहिवाशी होते. ते अल्पभूधारक शेतकरी होते. 19 जुलै रोजी शेतात मशागतीचे काम करीत होते. दरम्यान बैलाला पाणी पाजण्यासाठी ते शेततळ्यावर गेले होते. तिथे त्यांना एका विषारी सापाने चावा घेतला. मात्र त्यांना काटा रुतल्याचे वाटल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. बैलांना शेतात पाणी पाजल्यानंतर ते पुन्हा शेतीच्या कामात गुंतले.

काही वेळानंतर ते बेशुद्ध झाले. ते बेशुद्ध पडल्याची माहिती परिसरातील काही शेतक-यांना मिळाली. दत्ता यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते.

मात्र सोमवारी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, मुलगा व आप्त परिवार आहे.

हे देखील वाचा:

स्पेनमधील रांगोळी महोत्सवासाठी वणीच्या अश्विनी वऱ्हाडे हिची निवड

आता अवघ्या 1.5 हजारात कुंपन झटका मशिन

Leave A Reply

Your email address will not be published.