गुढीपाडवा :नव्या हंगामाच्या मशागतीला आजपासून सुरुवात

बदलत्या काळानुसार मोजक्याच ठिकाणी परंपरा

0

जितेंद्र कोठारी, वणी: हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व असून साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी शेतात नांगरणी करून आपल्या नवीन हंगामाचा शुभारंभ करण्याची परंपरा आहे. मात्र बदलत्या जमान्यात काही मोजक्याच ठिकाणी ही परंपरा जपली जातेय.

चैत्राच्या पहिल्या दिवशी कृषीजीवनाचे नवे वर्ष आज मंगळवारी सुरु झाले. तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी सकाळी उठून आपल्या नवीन जीवनाच्या नवीन वर्षाला सुरुवात केली.सकाळी लवकर उठून आपल्या शेतात जाऊन नांगर जुंपून नवीन वर्षाचे मुहूर्त केले. नंतर आपल्या बैलांना अंघोळ घालून त्यांना नैवद्य देण्यात आले. मात्र ही परंपरा ग्रामीण भागातील ठराविक गावातील शेतकरीच जोपासत असताना दिसून येत आहे.

सध्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे बैलांची संख्या कमी झाल्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीतली कामे करुन शुभारंभ केला जातो. मात्र काही शेतकऱ्यांकडे शेतात अजून पिके असल्याने शेतीकामांचा शुभारंभ करताना शेतात जागा नसल्याने शुभारंभ करता आला नाही. मात्र नववर्षाचे स्वागत करतांना घरावर गुढी उभारुन दारात रांगोळी घालून दरवाजावर फुलांचे व आंब्याचे तोरण लावले जाते.

शिवाय शेतकऱ्यांकडील गुरे, गाई म्हशी, व स्वतःकडील वाहने व मोटारसायकली धुवून पूजा केली जाते. तर मराठी नववर्ष चैत्र मासाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा येत असल्याने घरात गोड धोड पदार्थ, पुरणपोळी बनवून नैवद्य दाखवून, रांगोळी घालून, देवाची पुजा करुन नववर्षाचे स्वागत करण्याची मराठी परंपरा आजही आहे.

 

हेदेखील वाचा

कोरोनाचा वणी तालुक्यात कहर सुरूच

हेदेखील वाचा

ग्रामवासीयांच्या मूलभूत गरजांच्या विरुद्ध काम करणाऱ्या सदस्यांचे पद रद्द करा- मागणी

Leave A Reply

Your email address will not be published.