कत्तलीसाठी तेलंगणात घेऊन जाणा-या 4 जनावरांची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी: वणीहून तेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणा-या वाहनावर शिरपूर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी जनावरांची सुटका करण्यात आली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास महाकालपूर फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाहनचालकाला अटक करण्यात आली असून पोलिसांनी सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की रविवारी दिनांक 12 मार्च रोजी दुपारच्या सुमारास पोलीस पथक पेट्रोलिंगवर असताना त्यांना खबरीकडून वणीहून कायर कडे गोवंश घेऊन एक मालवाहक जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महाकालपूर फाट्यावर पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान दुपारी 4 वाजताच्या सुमारास वणीकडून एक क्रिम रंगाची एक टाटा मॅजिक (MH46 AX5901) ही मालवाहक गाडी येताना दिसली.

पोलिसांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. गाडी थांबल्यावर वाहनाची पाहणी केली असता आत क्षमतेपेक्षा जास्त जनावरे क्रुरतेने बांधलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता त्यांना चालकाचे नाव जिब्रान शेख अकील (25) रंगनाथ नगर वणी असल्याचे कळले. तसेच सदर जनावरे हे बेला जि. अदिलाबाद येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.

या प्रकरणी पोलिसांनी चार बैल ज्याची किंमत 89 हजार व टाटा मॅजिक ज्याची किंमत 3 लाख असा एकूण 3 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर महाराष्ट्र पशू संरक्षण कायद्यानुसार कलम 11 (D)(E)(H), मोटार वाहन कायद्याच्या कलम 83 व महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या कलम 119 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

शौचास गेलेल्या मुलीला फूस लावून पळवले, मुलीवर अत्याचार

दारु पिण्यास पैसे न दिल्याने काठीने बेदम मारहाण

Comments are closed.