वणीत ओबीसींचा रेकॉर्डब्रेक मोर्चा, सुमारे 8 हजार लोक मोर्चात सहभागी

जय ओबीसीच्या नाऱ्याने दुमदुमली वणी नगरी

0

विवेक तोटेवार, वणी: रविवार दिनांक 3 जानेवारी रोजी ओबीसींची जातनिहाय जनगणना व ओबीसींच्या हक्कासाठी वणीत विराट मोर्चा निघाला. या मोर्चात सुमारे 7 ते 8 हजार लोक उपस्थित होते असा अंदाज बांधला जातोय. मोर्चात शेकडो संघटना सहभागी झाल्या होत्या. जर ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली नाही तर जनगणना करण्याकरीता आलेल्या अधिकाऱ्यांवर बहिष्कार टाकणार असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला.

गेल्या काही दिवसांपासून ओबीसी मोर्चाविषयी जनजागृती सुरू होती. अखेर आज ओबीसींच्या मोर्चाचा दिवस उजाडला. रविवारी ना भूतो ना भविष्यती असा अभूतपूर्व मोर्चा आज वणीकरांनी अऩुभवला. दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास मोर्चाला नगरवाला जिनिंग येथून मोर्चाला सुरवात झाली. सुरवातीला रांगेत तीन तीनच्या रांगेत महिला होत्या. त्यानंतर पुरुष तर मागे ओपन जिप. ट्रॅक्टर होते. यावेळी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात ‘जय ओबीसी, जय संविधान’ ‘देख लेना आखोसे, आयेंगे लोखोसे’ ‘ओबीसी जनगणना. झालीच पाहिजे’ असे नारे देत रॅली निघाली.

रॅलीची लांबी सुमारे एक ते दीड किलोमीटर इतकी होती. अलीकडच्या काळात निघालेली ही सर्वात मोठी रॅली असल्याचे मानले जात आहे. या रॅलीत वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील अनेक जण सहभागी झाले होते. याशिवाय चंद्रपूर, यवतमाळ येथूनही मोर्चेकरी रॅलीत सहभागी झाले होते. याशिवाय परिसरातील सर्वच समाजातील संघटनानी या मोर्चात सहभाग दर्शविला. नगरवाला जिनिंगपासून सुरू झालेली ही रॅली बसस्टॉप, शिवाजी महाराज पुतळा, खाती चौक, गांधी चौक, सर्वोदय  चौक, टागोर  चौक, आंबेडकर चौक असा मार्गक्रमण करत निघाली.  दुपारी 2 वाजता पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावर रॅलीची सांगता झाली.

‘मी ओबीसी’ने वेधले लक्ष !
आज निघालेल्या ओबीसीचा मोर्चा हा मोठया अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघाला. रॅलीचे ‘मी ओबीसी’ असे लिहिलेले टीशर्ट, टोपी, झेंडे व दुपट्टे प्रमुख आकर्षण ठरले. अर्ध्या अधिक लोकांनी पिवळ्या रंगाचे ‘मी ओबीसी’ लिहिलेले टीशर्ट व टोपी घातली होती. याशिवाय जवळपास सर्वच मोर्चेक-यांनी ‘मी ओबीसी’ लिहिलेला पिवळ्या रंगाचा दुपट्टा परिधान केला होता. रॅलीमध्ये हजारो पिवळ्या रंगाचे मी ओबीसी असे लिहिलेले ध्वज होते. यांनी वणीकरांचे लक्ष वेधून घेतले. 

रॅलीची सांगता झाल्यानंतर शासकीय मैदानावर तयार केलेल्या विचारपीठावर मान्यवरांची भाषणं झाली. यात अध्यक्षीय भाषणात प्रदीप बोनगीरवार म्हणाले की ओबीसींची स्वतंत्र जनगणना केली जात नसेल तर कोणताही ओबीसी बांधव जनगणनेत सहभागी होणार नाही. याशिवाय जनगणनेबाबत आम्ही असहकार आंदोलन उभारू असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी मोहन हरडे यांनी कलम 340 नुसार जर जातनिहाय जनगणना झाली नाही तर आपण 340 दिवस जनगणनेत का शामिल होऊ नये याची माहिती लोकांपर्यत पोहचविणार असल्याचे सांगितले. कोळंबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. भाषणाच्या समारोपाच्या वेळी ओबीसींची स्वतंत्र जनगणना न झाल्यास सर्व ओबीसी बांधव या जनगणनेविरुद्ध असहकार आंदोलन पुकारणार असा ठराव झाला.

यावेळी विचारपीठावर सर्व जातीचे ओबीसी नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये अश्विनी रंगुरवार, अर्चना बोधनकर, रुद्रा कुचनकर, कविता चटकी इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास चिडे, राम मुडे, काशिनाथ पचकटे, मारोती जीवतोडे, गजानन चांदावार, आनंद बनसोड यांनी केले. प्रस्ताविक प्रवीण खानझोडे यांनी केले, हेमराज कळंबे यांनी मनोगत व्यक्त केले. तर मोर्चाची भूमिका मोहन हरडे यांनी मांडली. उपस्थितांचे आभार दिलीप भोयर यांनी मानले.

कार्यक्रमानंतर लगेच उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र, मुख्य सचिव, मंत्री अन्य पिछडा वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जनजाती, पिछडा वर्ग कल्याण यांना निवेदन देण्यात आले.

कचरा गोळा करण्यासाठी विशेष टीम
यावेळी विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी रॅलीत सहभागी होणाऱ्याकरिता नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. ही व्यवस्था टिळक चौक, आंबेडकर चौक, सुभाषचंद्र बोस चौक, खाती चौक, गाडगे बाबा चौक या ठिकाणी करण्यात आली होती. सोबतच होणार कचरा उचलण्यासाठी रॅलीच्या मागे स्वयंसेवकांची एक टीम होती. तसेच शासकीय मैदानावर सुद्धा कचरा गोळा करण्यासाठी एक टीम होती.

रॅलीत पोलिसांचा कडक बंदोबस्त
रॅलीचा पूर्वप्रतिसाद बघता आणि होणाऱ्या गर्दीचा अंदाज लक्षात घेता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. रॅलीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये व रॅली शांततेत पार पडावी याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार वैभव जाधव यांनी खास शिरपूर, पाटण, मुकुडबन, मारेगाव याशिवाय यवतमाळ येथील अतिरिक्त कुमक बोलाविली होती. त्यांच्या कडक बंदोबस्त व नियोजनामुळे मोर्चामुळे कुठेही ट्राफिक जाम झाली नाही व मोर्चा निर्विघ्ण, शांततेत पार पडला.

मोर्चाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप बोनगीरवार, मोहन हरडे, प्रवीण खानझोडे, राजू तुरणकर, विकास चिडे, रुदा कुचनकर, दिलीप भोयर, संजय चिंचोळकर, अनिल आक्केवार, नारायण मांडवकर, मधुकर रचावार, प्रमोद निकुरे, राजु देवडे, राम मुड़े, गजानन चंदावार, विलास शेरकी, संजय गाताडे, संजय पेचे, राहुल खारकर, रविंद् ताटकोंडावार, किशोर ओचावार, हरिश मोहबिया, दिपक बन्हाडे, आनंद बनसोड, संतोष भांडारकर, भाऊराव पारशिवे, विजय माळीकर, रविकांत मैद, आसिफ शेख, भाऊसाहेब आसुटकर, दिनोद किडीले, अजिंक्य शेंडे, बंडू येसेकर, संजय साखरकर, पांडुरंग पंडिले, अनंत एकरे, धनंजय आंबटकर, अशोक चौधरी, रमेश सुंकूरवार, नामदेव जेनेकर, ऋषीकांत पेचे, आनंद नक्षणे, मारोती मोडक, बाळकृष्ण राजुरकर, पुंडलिक मोहीतकर, अंबादास वागदरकर, लक्ष्मण इदे, दिलीप मालेकर, राजेश पहापले, संजय चिंचोलकर, किसन दुधलकर, प्रमोद निबुळकर, अविनाश परसावार, संजय वाणी, कैलाश पचारे, सुनिल जाधव इत्यादींनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

वणीतील ‘त्या’ गोळीबाराला झाले 47 वर्ष पूर्ण

हे देखील वाचा:

वणी पोलीसांची रेती तस्करांविरुद्ध धडक कारवाई

Leave A Reply

Your email address will not be published.