सुभाषचंद्र बोस चौकातील देशी दारुच्या दुकानावर धाड

आबकारी व पोलीस विभागाचे एकमेकांकडे बोट

0

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाऊनमुळे संध्याकाळी 5 वाजता दुकाने बंद करणे गरजेचे असताना शहरातील एक देशी दारूचे दुकान 5 वाजेनंतरही सुरू होते. या दुकानावर पोलीस विभागने धाड टाकली व सदर प्रकरण उत्पादन शुल्क विभागाकडे दिले. मात्र सदर दुकानावर कारवाई तर दूरच उलट याबाबत उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभागामध्ये कोणताही ताळमेळ नसल्याने समोर आले आहे. दरम्यान धाड पडल्यानंतरही आज बुधवारीही सदर दारूच्या दुकानातून संध्याकाळी 5 वाजल्यानंतरही दारूची विक्री सुरूच असल्याचे आढळून आले आहे. 

मंगळवारी वणी येथील सुभाषचंद्र चौकात एक परवानाधारक देशी दारु दुकानातून सायंकाळी 5 वाजल्या नंतरही दारु विक्री असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीवरून पीएसआय प्रताप बाजड तात्काळ सुभाषचंद्र चौक येथे पोहचले. त्यावेळी परवानाधारक वरलक्ष्मी ट्रेडर्स या दुकानातुन अर्धा शटर बंद करून दारू विक्री होत असल्याचे त्यांना आढळले.

पोलिसांनी याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवून प्रकरण त्यांचेकडे वळते केले. मात्र त्यानंतर वरलक्ष्मी ट्रेडर्स प्रतिष्ठानवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. वास्तविक पाहता नियमांचे उल्लंघन केल्यावरून पोलिसांनी त्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करायला हवी. परन्तु पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती देऊन आपले हात झटकले. तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आपले कर्तव्य विसरून पोलीस विभागाकडे बोट दाखवीत आहे.

दुकान बंद असताना कारवाई कशी करणार: नारायण सुर्वे
सुभाषचंद्र बोस चौकात परवानाधारक देशी दारू दुकान सायंकाळी 5 नंतर सुरु असल्याचे पत्र पोलीस विभागांना मला दिले. मात्र मी पाहणी करण्यासाठी गेलो असता दुकान बंद होती. त्यामुळे कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही. पोलिसांनी तात्काळ कारवाई करायला हवी होती.
नारायण सुर्वे : उप निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, वणी

——————————————-

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी का नाही?: प्रताप बाजड
माहितीवरून आम्ही गेलो असता त्या दुकानातून अर्धे शटर उघडून दारु विक्री सुरु होती. त्याबाबत आम्ही लगेच राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना कळविले. आबकारी अधिकाऱ्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यास खरेखोटे स्पष्ट होईल.
प्रताप बाजड : पोलीस उप निरीक्षक, पो.स्टे. वणी

आजही दुकानातून छुप्या रितीने दारूची विक्री सुरूच

प्रशासनाचा काही धाक उरला की नाही?
दोन विभागामध्ये कारवाईबाबत कोणताही ताळमेळ नसल्याने दुकानदारांचे चांगलेच फावत आहे. आज संध्याकाळी पावणे सहा वाजता ‘वणी बहुगुणी’ने सदर ठिकाणी भेट दिली असता तिथे आजही अर्धे शटर टाकून दारू विक्री सुरू होती. त्यामुळे प्रशासनाचा काही धाक उरला की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहून जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊनचे नियम न पाळणा-यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांच्या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे. 

हे देखील वाचा:

रेड लाईट एरियातील देहव्यापार अड्ड्यावर धाड

Leave A Reply

Your email address will not be published.