अधिकाऱ्यांची कार्यालयाला दांडी, राजू उंबरकर यांची पोलिसात धाव

जितेंद्र कोठारी, वणी : वणी हा तालुका मुख्यालय असताना बहुतांश अधिकारी आपल्या कार्यालयात हजर नसल्यामुळे संतप्त मनसे नेता राजू उंबरकर यांनी वणी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन अधिकाऱ्यांना शोधून देण्याची मागणी केली आहे. वणी हा नक्षलग्रस्त चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यालगत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचा नक्षलवाद्यांनी तर अपहरण केला नसावा, अशी शंका त्यांनी निवेदनात नमूद केली आहे.

राजू उंबरकर यांनी शहरातील शासकीय कार्यालयांचा फेरफटका मारला असता फक्त एसडीओ, तहसीलदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या कार्यालयात उपस्थित होते. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग, जि. प. बांधकाम विभाग, कृषी अधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, वजन माप कार्यालय, तालुका क्रीडा अधिकारी तसेच पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी आपल्या कार्यालयात गैरहजर असल्याचे आढळले. 

अधिकारी वर्गाच्या अनुपस्थितीमुळे संतप्त फिर्यादी राजू उंबरकर (47) रा. लक्ष्मीनगर वणी यांनी सोमवार 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी वणी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार देऊन वरील कार्यालयातील अधिकारी कुठे आहे. अधिकाऱ्यांना नक्षलवाद्यांनी तर उचलून नेले नसावे. याची चौकशी करून शोधून काढण्याची विनंती केली आहे. 

वणी येथील बहुतांश शासकीय कार्यालयांचा कारभार रामभरोसे आहे. कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी मनमर्जीचे मालक झाले आहे. कार्यालयीन वेळेवरसुद्धा ते कार्यालयात हजर राहत नाही. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी व सर्व साधारण नागरिकांचे महत्वाचे कामे खोळंबली आहे. मुख्यालयी राहण्याचा शासकीय नियम असताना काही अधिकारीवर्ग यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर येथून अप डाऊन करतात. 

Comments are closed.