पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही…. विविध धाडीत 24 खर्रे जप्त…

वणी पोलिसांच्या कारवाईचे शहरात कौतुक...

जितेंद्र कोठारी, वणी: सुगंधित तंबाखू व खर्रा विक्रेत्यांविरुद्ध वणी पोलिसांनी ‘मोठ्ठी’ कार्यवाही करत धाडसत्र अवलंबविले. या कार्यवाहीत पोलिसांनी एकाच दिवशी 4 पान टपरीवर धाड टाकत तब्बल 24 म्हणजे 2 डझन खर्रे जप्त करत खर्रे जागीच नष्ट केले. प्रतिबंधित तंबाखू विक्री विरुद्ध वणी पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे खर्रा शौकिनांमध्ये पोलिसांच्या कार्यवाहीमुळे खळबळ उडाली आहे.

सुगंधी तंबाखू व प्रोसेस केलेल्या तंबाखू व सुपारीवर शासनाने बंदी घातली आहे. वणीतच नव्हे तर अख्या विदर्भातच खर्रा हे सर्वात लोकप्रिय ‘खाऊ’ आहे. या लोकप्रिय आणि प्रतिबंधित ‘खाऊ’ची अवैधरित्या काही टपरीवरून विक्री होत असल्याची गोपनीय माहिती वणी पोलिसांना मिळाली. बाहेरून गरीब दिसणारे व आतून या खाउची विक्री करून प्रचंड गब्बर झालेल्या टपरी चालकांना ‘धडा’ शिकवण्यासाठी ‘धाड’सत्र अवलंबण्याचा गुप्त प्लान पोलिसांनी आखला.

त्यानुसार गुरुवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी पोलीस पथकाने शहरातील पंचशील नगर येथे सैय्यद शाहरुख सै. सरवर याच्या पान टपरी धाड टाकून मजा तंबाखूचे 6 खर्रे किंमत 180 रु. जप्त केले. विजय पान सेंटरमधून 6 खर्रे, आंबेडकर चौक येथील मिताष पान सेंटर मधून 6 खर्रे व शंकर पान सेंटरमधून 6 खर्रे असे एकुण 720 रुपये किमतीचे 24 खर्रे जप्त केले. जप्त केलेले खर्रे जागीच नष्ट करण्यात आले व आरोपी विरुद्ध कलम 6 (B) कोप्ता 2003 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सदर कारवाईमुळे टपरी चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे, तर दुसरीकडे सुगंधीत तंबाखूचे मोठे व्यापारी, सप्लायर खर्रे विकत नाही. ते ‘पटेल’ असेच काम करतात. विशेष म्हणजे अनेक सप्लायरकडून खर्रा ‘चावला’ ही जात नाही. त्यामुळे ते खर्रा विकण्याच्या फंद्यात पडत नाही. परिणामी त्यांना हा चांगलाच दिलासा मानला जात आहे. 

खर्रा खाणा-या कर्मचा-यांमध्ये दहशत?
शहरात ठिकठिकांनी टपरी टाकून त्यातून अवैधरित्या खर्रे विकून टपरीचालकांनी लाखोंची ‘माया’ गोळा केल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे पोलिसांच्या सातत्याने कार्यवाहीमुळे सुगंधी तंबाखूचे सप्लायर मात्र देशोधडीला लागलेत. ते थोडा बहुत माल विकून आपल्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करतात, अशी जनमानसात चर्चा आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक कार्यालयाच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर खर्रा घुटाई सुरू असते. कर्मचा-यांना इथे एका हाकेवर खर्रा मिळतो. त्यामुळे खर्रा खाणारे कर्मचारी दहशतीत तर आले नाही? अशी चर्चा सध्या रंगत आहे. 

पोलीस विभाग ऍक्शन मोडवर आला आहे. आता अन्न व औषधी प्रशासन विभाग कधी ऍक्शन मोडवर येणार असा सवाल आता विचारला जात आहे. 

हे देखील वाचा: 

आरोग्य शिबिरात 1200 तर सामान्य ज्ञान स्पर्धेला 1600 विद्यार्थ्यांचा सहभाग

स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध

जाधव सर्जिकल क्लिनिकचे थाटात उद्घाटन

Comments are closed.